Monday, January 29, 2007

LIFE @ IITB

life @ iitb-1
बरेच दिवस विचार करत होते कि या विषयावर लिहावे, पण वेळ आज मिळाला आहे. कदाचीत प्रत्येक गोष्टिसाठी एक वेळ ठरलेली असते. IIT मधे शिकणे प्रत्येक अभियांत्रिकीच्या मुलाचे ( आणि मुलींचेही ) स्वप्न असते असे म्हटले तर ते अतिशयोक्ति ठरणार नाही. तसे ते माझेही स्वप्न होते. GATE चा आडथळा पार केल्यावर ते पुर्ण होण्याची चिन्हं मला दिसू लागली. माझ्या नशिबानी आणि थोडया प्रयत्नांनी मला ईथे पदव्युत्तर शिक्षणाची संधी मिळाली.मला IITB मधे admission मिळाली. मग काय मी तर पुर्ण हवेतच होतो. जो तो अभिनंदन करत होता, काहीना काहीतरी माहिती आणि सल्ले देत होता. मलाही तिथल्या सगळयाच गोष्टींबद्दल उत्सुकता लागुन राहीली होती. ईंटरव्हुच्यावेळी मी तसे हॉस्टेल्स आणि कँपसमधे फिरुन आलो होतो. पण आता प्रत्यक्ष तिथे रहायच्या, शिकायच्या कल्पनेनी खुप आनंद होत होता. ईथल्या लाईफबद्दल खुप ऐकले होते आता ते अनुभवायचे होते. ईथे आणि वरती नावात लाईफ हा शब्द मुद्दामुच वापरला आहे. कारण IIT मधे काही शब्द गेली कित्येक वर्षे चालत आले आहेत. त्यामुळे ति परंपरा मलही मोडुन चालणार नाही. ते शब्द पुढे येतच राहतील. असो तर ईथे आम्ही (एकदाचे) आलो.


गुगल अर्थवरुन घेतलेले चित्र (IIT)


हिरवागार परिसर (IIT) समीर हिल्स




ईथे आमचे स्वागत इतके जोरदार झाले की आख्खि मुंबई तो दिवस कधीही विसरणार नाही, म्हणजे २६ जुलैला आमचा शैक्षणिक प्रवास सुरु झाला. त्या दिवशी मुंबईत पावसाने नविन रेकॉर्ड बनवुन काय थैमान घातले ते मागील एका ब्लॉगमधे सांगितले आहेच. त्याच पावसाने मेसमधे पाणी आल्याने दुस-याच दिवशी मेस बंद पडली. पुढील दहा दिवस फक्त पाव, जॅमवर काढावे लागले. जेवणही सायकल पार्कींगमधे करावे लागत होते. एकुणच फार “पेन”(हा येथील काही नेहमीच्या शब्दांपैकी एक ) फुल सुरुवात झाली होती. पण हा पेन खुपच छोटा होता हे पुढे सेमीस्टर चालू झाल्यावर समजले.


हॉस्टेल नं १२
मला H-12 हॉस्टेल मिळाले होते. हे सगळ्यात नवीन हॉस्टेल असल्याने सर्वसोयियुक्त होते. हॉस्टेलमधे जिम्, टिव्ही रुम, कॉम्प्युटर लॅब, टे.टे ची सोय, ऑटोमॅटीक वॉशिंग मशीन्स, सततची स्वच्छता, रुममधे चोवीस तास ईटरनेट, कित्येक सर्व्हर्स, आणि दिवसरात्र चालू असलेले कँटीन यामुळे पहीले काही दिवस मी एकदम स्वर्गातच असल्यासारखे वाटत होते. पण लवकरच आमची अवस्था गोष्टीतल्या त्या, समोर पंचपक्वानाचे ताट वाढलेल्या पण हात बांधुन ठेवलेल्या माणसांसारखी झाली. कारण...
पहिल्या सेमीस्टरमधे खुप लोड असतो असे सगळ्या सिनिअर्सकडुन आधीच कळाले होते. त्यामुळे खुप अभ्यास करायचे असे ठरवुनच मी सुरुवात केली होती. आत्तापर्यंत परिक्षा आगदी तोंडावर आल्यावर अभ्यासाला लागण्याची सवय होती, तसे ईथे चालणार नव्हते. रोज सकाळी उठुन अभ्यास करण्याचे ठरवले होते. रात्रि जागुन अभ्यास करणे मला कधीही जमले नव्हते. पण ईथे जसजसे सेमीस्टरमधे पुढे जात होतो, तसतसे अभ्यासाचा लोड खुपच वाढत होता. आता रोज रात्रि एक, दोन वाजेपर्यंत जागुन अभ्यास करणे आता क्रमप्राप्त होते.( असे अनेक बदल माझ्यात घडत होते.) शिवाय सकाळी लवकर लेक्चर्स असायची ते वेगळीच. लवकरच सर्व प्राध्यापकांनी त्यांचे आवडती हत्यारं म्हणजे टेस्टस् आणि आसाईनमेंटस् बाहेर काढली. त्यांना तोंड देतादेता आगदी पुरेवाट झाली होती. ईथे प्रत्येक टेस्ट आणि असाईनमेंटस् चे मार्क सेमीस्टच्या शेवटी काउंट होत असल्यामुळे सतत चांगला परफॉर्मन्स देणे भाग होते. दिवसेंदिवस “ पेन ” वाढतच होता. दिवस आणि रात्रिमधे काहीच फरक वाटत नव्हता. आता रोजचे झोपणे चार-साडेचार तासांवर आले होते. एकदा माझा एक मित्र गमतीने म्हणाला होता की, “ आजकाल मी दोन मिनीटे मिळाली तरी झोपुन घेतो ”. अशातच प्रत्येक विषयांचे कोर्स सेमीनार दोन दोन मुलांच्या ग्रुप्सना देण्यात आले. पण संगणक आणि चोविस तास ईंटरनेट असल्यामुळे सेमीनारची तयारी करणे काहीसे सोपे जात होते. सिनीअर्सकडुन जरनल पेपर कसे शोधायचे ते शिकुन घेतले होत. शिवाय ‘ गुगल ’ सारखा कल्पवृक्ष मदतीला होताच. पण सेमीनारला खुपच जास्त वेटेज् असल्यामुळे जरा जास्तच ‘फाईट’ (येथिल आणखि एक प्रचलीत शब्द) मारावी लागत होती. हा कामाचा ताण आपल्यासारख्याच समःदुखी मित्रांमुळे आणि सिनीअर्सच्या ‘ पहीलीच सेमीस्टर एवढा लोड असतो ’ अशा आशावादी वाक्यांमुळे थोडा कमी होत होता. अशाप्रकारे एकुण पहीली सेमीस्टर, नंतर चांगले दिवस येतील या आशेवर काढत होतो. अभ्यासाबद्दल जरा जास्तच लिहीले असे दिसते.
शेवटी एकदाची ति पहीली सेमीस्टर संपली. मला तो दिवस कायम आठवणित राहील. २३ नोव्हेंबर च्या त्या संध्याकाळी आम्ही सगळया मुलांनी कँटीनमधे एकत्र जमुन खुप दंगा केला. सगळेजण सलग २-३ दिवस झोपले नव्हते, पण सेमीस्टर संपल्याचा आनंद सगळ्यांच्या चेह-यावर दिसत होता.
IITB मधिल खरं लाईफ माझ्या मते दुस-या सेमीस्टरमधेच चालू होते. जानेवारी मधे परत आल्यावर मग आम्ही इथल्या प्रत्येक गोष्टीत भाग घेण्याचे ठरवले. जिम, टे.टे, भटकंती, सर्व्हर्सवरुन पिक्चर घेउन पाहणे, यासारख्या अनेक गोष्टींमधे आम्ही लुडबुड करु लागलो. आता बरेच मित्र झाले होते. अभ्यासाचा लोडही जास्त नव्हता किंवा आता सवय झाली होती म्हणा, त्यामुळे ख-या अर्थाने आम्ही येथिल लाईफ एन्जॉय करत होतो. रात्रि जागणे ही आता एक सवय झाली होती. दोन अडीच वाजताही जबरजस्ती झोपावे लागत होते. रात्रि एक-दिडपर्यंत टेबल-टेनिस खेळुन, कँटीनमधे सर्वजण जमत असु आणि तिथे तर गप्पांना उत येत असे. तिथल्या विषयांना तर कसलीही बंधने नव्हती.
असेच एकदा चर्चा करताना आम्ही काही उत्साही मित्रांनी टेकफेस्टमधे भाग घेण्याचे ठरवले. ‘ टेकफेस्ट ’ हा भारतामधील सगळ्यात मोठा टेक्निकल फेस्टिवल आहे. भारतातल्या सगळ्या भागातून अनेक कॉलेजेसची मुले यात भाग घेतात. यासाठी कित्येक दिवस आधि तयारी करत असतात. दरवर्षी जानेवारीत हा भरवला जातो. आम्हाला तयारीसाठी जेमतेम आठ दिवस मिळणार होते. स्पर्धेत भाग घेण्याची अंतिम तारिख उलटुन आता महीना होत आला होता. त्यामुळे पहिला अडथळा प्रवेश कसा मिळवायचा हा होता. पण हा प्रश्न आम्ही IIT चे विद्यार्थी असल्यामुळे आणि संयोजकांमधे आमचेच सिनिअर मित्र असल्याने सुटला. आता मात्र दिवसरात्र एक करुन काम करायचे होते.
आम्ही भाग घेतलेल्या स्पर्धेचे नाव होते, ‘ फुल थ्रोटल ’. एक दुरनियंत्रक संचालित वाहन बनवायचे होते, जे ४० मीटर सरळ अंतर २० सेकंदात कापेल. आम्ही पहिल्यांदा एक दोन डिझाईन बनविली आणि सरळ पुढील कामाला लागलो. सर्वप्रथम ३.२ सिसिचे छोटे आई. सि. ईंजिन शोधायचे होते. खुप ठिकाणी चौकशी केल्यावर आणि फिरल्यावर एका ठिकाणी २.५ सिसिचे विमानाचे ईंजिन आम्हाला मिळाले. पण आता ते ईंजिन बनविणा-या वाहनावर चालेल कि नाही याची कुणालाच खात्रि नव्हती. तसेच त्याची किंमत ही खुप होती. त्यामुळे काय करायचे ते ठरत नव्हते. शेवटी तिथेच चर्चा करुन निर्णय घेतला, आता एकदा ईंजिन विकत घेतल्यावर मागे फिरण्याचा प्रश्नच येत नव्हता. आता स्पर्धा ४-५ दिवसांवर आली होती. आम्ही सगळे कामाला लागलो. गाडी बनवण्याचे काम एका लॅबमधे करत होतो. तिथे सगळी मशिन्स वापरायला मिळत असल्याने, वेगाने काम करणे शक्य होते. पण दिवसा लॅबमधे काम करणे शक्य नसल्याने आम्ही सगळेजण रात्रि १०.०० ला कामाला सुरुवात करत होतो. प्रत्येकाने कामाची विभागणी करुन आपले काम करणे चालू केले. वेळ कमी होता पण प्रत्येकाचा उत्साहमात्र वाखाणण्याजोगा होता. रात्रि दोन तिन वाजेपर्यंत काम करुन झाल्यावर कोणीतरी काही खायला घेउन येत असे. ते खाता खाता खुप दंगामस्ती चालत होती. येणा-या प्रोब्लेम्सवर चर्चा होत असे. खाणं झाल्यावर मग पुन्हा कामाला सुरुवात करुन साकाळी सहा-सात वाजेपर्यंत काम चालत असे. आता दिवसरात्रीमधे काहीच फरक उरला नव्हता. काम सतत चालूच होते. हळुहळू गाडी पुर्ण तयार झाली. त्यावर दुरनियंत्रकहि बसविला, पण अचानक एक संकट उभे राहीले. पहिल्यापासुनच गाडीचे ईंजिन चालू होण्यास खुपच त्रास देत होते. ईंजिनचे सेटींग निट जमत नव्हते. तसेच आमची गाडी सुरुवात करताच बंदही पडत होती. हा प्रोब्लेम ईतका मेजर होता की स्पर्धेतुन आधिच बाहेर पडण्याचाही विचार झला.
पण तेवढयात आमच्याच कॉलेजच्या एका दुस-या टिमच्या गाडीचे ईंजिन काम करत नसल्याचे कळाले. त्यांच्या गाडीची बॉडी आणि आमचे ईंजिन आणि दुरनियंत्रक प्रणाली वापरुन एक नवीन गाडी बनवण्याची कल्पना पुढे आली. त्यांच्याकडे स्टार्टर असल्याने गाडी सुरु करण्याचा प्रोब्लेम सुटू शकत होता. पण आता प्रश्न होता तो फक्त वेळेचा. स्पर्धा सुरु होण्यासाठी चोविस तासही उरले नव्हते. शेवटी पुन्हा एकदा फाईट मारुन एका रात्रित आम्ही गाडी बनविली.
आता टेस्ट केल्यावर गाडी निट चालत होती. स्पर्धेच्यावेळी आम्ही सगळे अतिशय उत्सुकतेने गा़डी उतरविली. स्पर्धा चालू झाली, आमची गाडी निम्मेअधिक अंतर गेली असेत तेवढयात अचानक दुरनियंत्रकात काही प्रोब्लेम आला, गाडी शेजारच्या संरक्षणासाठी लावलेल्या टायर्सवर आदळली आणि आम्ही स्पर्धेतुन बाहेर पडलो. आमचे गेले आठ दिवस घेतलेले सर्व कष्ट वाया गेले होते. त्यादिवशी कुणाचाच कशातही मुड लागत नव्हता. आम्ही हारलो होतो पण त्यातही खुपकाही शिकायला मिळाले होते. एकुण आम्ही टेकफेस्ट खुप आणि ख-या अर्थाने एंजॉय केले होते.

Saturday, July 29, 2006

लाईफ इज् ब्युटीफुल





लाईफ इज् ब्युटीफुल

कधी कधी आपण आगदी ठरवुन एखादी गोष्ट करतो आणि तरिही मनासारखी होत नाही, तर कधी काही ध्यानिमनीही नसताना अचानक जमुन जाते आणि शब्द निघतात वा!. परवा असेचं घडले. त्याचे असे झाले की बरेच दिवस माझ्या संगणकात एक इंग्रजी चित्रपट ठेवला होता. चित्रपटाचे नावं होते “लाईफ इज् ब्युटीफुल”. सहज म्हणुन चालू केला आणि बघतच बसलो. दिड तासं कसा गेला मुळीच नाही कळाले. माझे मलाच आश्चर्य वाटत राहीले की इतके दिवस मी कसा काय पाहिला नाही. असो, चित्रपट अतिशय सुंदर आहे हे वेगळे सांगायला नकोच.
चित्रपट दुस-या महायुद्धाच्या काळातला आहे. नाझींनी ज्यु लोकांवर केलेले अत्याचार सर्वश्रृत आहेतच. त्यावेळी जर्मनांनी ज्यु लोकांना राबवुन घेण्यासाठी आणि ठार मारण्यासाठी बरेच कॅंपस् उभारले होते. त्यांना डेथ कॅंपही म्हटले जात असे. अशाच एका कॅंपमधे चित्रपटातील आपल्या या नायकाला आणि त्याच्या मुलाला आणले जाते. ज्या दिवशी त्यांना नेले जाते त्याचं दिवशी मुलाचा वाढदिवस असतो. पण आपल्या मुलावर या बाहेरच्या क्रृर जगाचा जराही स्पर्श होउ नये म्हणुन झटणा-या नायकाची धडपड मनाला हालवुन जाते. स्वतःच्या मनातील राग आणि भिती गिळुन मग तो आपल्या मुलाला एका दुस-याच विश्वात घेउन जातो. ते विश्वही त्या मुला सारखेच अतिशय निरागस असते. तेथे सगळेजणच लपाछपीचा खेळ खेळत असल्याचे नायक आपल्या मुलाला भासवितो. तो खरोखरच खेळ असल्याचे भासविण्यासाठी त्या अत्यंत कठीण परिस्थितही अनेक वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधुन काढतो. स्वतः कितीही थकला असताना आपल्या मुलाला त्या प्रतिकुल परिस्थितीतही केवळ टवटवित ठेवण्यासाठी तो सतत झटत असतो. वेगवेगळ्या प्रसंगातुन हे अतिशय उत्कृष्टपणे दाखविले आहे. त्याची ही केविलवाणी धडपड डोळ्यात पाणी आणुन जाते. शेवटी डेथ कॅंपमधेही आपल्या मुलाचा जिव, बालपण आणि निरागसता वाचवण्यात तो यशस्वि होतो. पण या सर्व प्रयत्नात त्याला मात्र आपला जिव गमवावा लागतो.
असा हा एकदम वेगळा चित्रपट खरचं खुप परिणाम करुन जातो, खुप काही शिकवुन जातो.

Tuesday, July 04, 2006

मुंबईचा पाउस...माझा अनुभव

काय लिहावं ते विचार करत होतो. काहीचं ठरतं नव्हते मग म्हटले, पाउसाबद्दलच लिहुन श्रीगणेशा करावे, त्याच्याच साथित. खुप ऐकले होते मुंबईचा पाउस असा असतो, तसा असतो. पुर्वीपासुन खुप इच्छा होती की एकदा मुंबईचा पाउस पहायला मिळावा. तसा योग मागच्या वर्षी आलाही. मी मुंबईत पुढिल शिक्षणासाठी आलो होतो. ऐन पावसाळ्यात आमचा शैक्षणिक प्रवास सुरु होत होता. २६ जुलैला माझ्या या प्रवासाच्या पहील्याच दिवशी या पावसाने धो धो पडुन जोरदार हजेरी लावली. आमची सगळी लेक्चर्स पहिल्याच दिवशी बंद पाडली. मी एकदम खुष. आता मला मुक्तपणे पाउसाची मजा लुटता येणार होती.
आता काय करावे, नव्या कँपसमधे कुठे कुठे भिजत फिरावे याचा विचार करण्यासाठी आम्ही तिघे चौघे मित्रमंडळी जमलो होतो आणि.......
..... अचानक मझ्या मित्राच्या खोलीत, दाराखालुन एकदम पाण्याचे लोट शिरायला लागले. पाण्याचा वेग ईतका होता की पाण्याने काही क्षणातचं जवळजवळ एक फुटाची पातळी गाठली. मित्राची बॅग कॉटखालुन तरंगत बाहेर आली. मला तशाही परिस्थित एकदम टाईटॅनिक पिक्चरची आठवण झाली. आम्ही सगळेजण ओले होणारे सामान वरती ठेवण्याचे प्रयत्न करत होतो. एकजण बादलीने पाणी बाहेर काढत होता. पण पाणी ईतक्या प्रमाणात आत येत होते की थोडयाच वेळात आम्ही तो निष्फळ प्रयत्न सोडुन दिला. मग सामान आवरुन, वरती सुरक्षित जागी ठेवले आणि आम्ही बाहेर हॉस्टेलमधेच फिरायला जायचे ठरवले. बाहेर येउन पाहतो तो काय सगळेचजण आमच्यासारखेच फिरायला चालले होते. एकमेकांना स्वतःचे अनुभव सांगत होते. एकुण सगळेजण खुपच एन्जॉय करत होते.
शेवटी आम्हीही थोडे ईकडे तिकडे फिरलो, आणि खोलीत परत येउन पाहतो तो काय... ते न विचारता आलेले पाणी गुपचुप निघुन गेले होते. मागे फक्त भिंतीवर निषाणि ठेवुन गले होते. मग आम्ही ति एक आठवण म्हणुन भिंतीवर वेळ आणि तारिख नोंदवुन ठेवली. माझी खोली वरच्या मजल्यावर असल्याने त्या रात्रि सगळेजण माझ्याचकडे झोपायला आले होते. रात्रि पाउसाचीच चर्चा करताना केव्हा झोप लगली ते कळालेही नाही.
सकाळी उठलो तेव्हा पाउस थांबला होता, सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. चहा पिताना वर्तमानपत्र वाचले तेव्हा डोळ्यांवर विश्वास बसेना. पाउसाचा प्रहाराने संपु्र्ण मुंबई जणु काही थांबली होती. सगळीकडे पाउसाच्या विध्वंसाच्या खाणाखुणा दिसत होत्या. मी पटकन घरी फोन केला. मला सोडायला आलेले माझे वडील आजुन घरी पोहोचले नव्हते. त्याना दोन दिवस रेल्वेत काढावे लागले. नंतर ते सुखरुप घरी पोहोचल्याची बातमी मला मिळाली.

अशाप्रकारे माझा मुंबईच्या पाउसाचा अनुभव खुप वेगळा असाच होता. माझ्या वडिलांसाठी तो काही वेगळा होता. तसाच तो प्रत्येक मुंबईकरासाठी वेगवेगळाच असेल. काहींसाठी तो चांगला असेल तर काहींसाठी तो खुप वाईटही असेल. पण प्रत्येकासाठी तो आयुष्यभर लक्षात राहण्यासारखामात्र नक्कीच होता.

आज जवळपास एक वर्ष पुर्ण होते आहे. तेव्हा विचार केला की माझा अनुभव जरुर सांगावा...