Tuesday, July 04, 2006

मुंबईचा पाउस...माझा अनुभव

काय लिहावं ते विचार करत होतो. काहीचं ठरतं नव्हते मग म्हटले, पाउसाबद्दलच लिहुन श्रीगणेशा करावे, त्याच्याच साथित. खुप ऐकले होते मुंबईचा पाउस असा असतो, तसा असतो. पुर्वीपासुन खुप इच्छा होती की एकदा मुंबईचा पाउस पहायला मिळावा. तसा योग मागच्या वर्षी आलाही. मी मुंबईत पुढिल शिक्षणासाठी आलो होतो. ऐन पावसाळ्यात आमचा शैक्षणिक प्रवास सुरु होत होता. २६ जुलैला माझ्या या प्रवासाच्या पहील्याच दिवशी या पावसाने धो धो पडुन जोरदार हजेरी लावली. आमची सगळी लेक्चर्स पहिल्याच दिवशी बंद पाडली. मी एकदम खुष. आता मला मुक्तपणे पाउसाची मजा लुटता येणार होती.
आता काय करावे, नव्या कँपसमधे कुठे कुठे भिजत फिरावे याचा विचार करण्यासाठी आम्ही तिघे चौघे मित्रमंडळी जमलो होतो आणि.......
..... अचानक मझ्या मित्राच्या खोलीत, दाराखालुन एकदम पाण्याचे लोट शिरायला लागले. पाण्याचा वेग ईतका होता की पाण्याने काही क्षणातचं जवळजवळ एक फुटाची पातळी गाठली. मित्राची बॅग कॉटखालुन तरंगत बाहेर आली. मला तशाही परिस्थित एकदम टाईटॅनिक पिक्चरची आठवण झाली. आम्ही सगळेजण ओले होणारे सामान वरती ठेवण्याचे प्रयत्न करत होतो. एकजण बादलीने पाणी बाहेर काढत होता. पण पाणी ईतक्या प्रमाणात आत येत होते की थोडयाच वेळात आम्ही तो निष्फळ प्रयत्न सोडुन दिला. मग सामान आवरुन, वरती सुरक्षित जागी ठेवले आणि आम्ही बाहेर हॉस्टेलमधेच फिरायला जायचे ठरवले. बाहेर येउन पाहतो तो काय सगळेचजण आमच्यासारखेच फिरायला चालले होते. एकमेकांना स्वतःचे अनुभव सांगत होते. एकुण सगळेजण खुपच एन्जॉय करत होते.
शेवटी आम्हीही थोडे ईकडे तिकडे फिरलो, आणि खोलीत परत येउन पाहतो तो काय... ते न विचारता आलेले पाणी गुपचुप निघुन गेले होते. मागे फक्त भिंतीवर निषाणि ठेवुन गले होते. मग आम्ही ति एक आठवण म्हणुन भिंतीवर वेळ आणि तारिख नोंदवुन ठेवली. माझी खोली वरच्या मजल्यावर असल्याने त्या रात्रि सगळेजण माझ्याचकडे झोपायला आले होते. रात्रि पाउसाचीच चर्चा करताना केव्हा झोप लगली ते कळालेही नाही.
सकाळी उठलो तेव्हा पाउस थांबला होता, सगळीकडे पाणीच पाणी झाले होते. चहा पिताना वर्तमानपत्र वाचले तेव्हा डोळ्यांवर विश्वास बसेना. पाउसाचा प्रहाराने संपु्र्ण मुंबई जणु काही थांबली होती. सगळीकडे पाउसाच्या विध्वंसाच्या खाणाखुणा दिसत होत्या. मी पटकन घरी फोन केला. मला सोडायला आलेले माझे वडील आजुन घरी पोहोचले नव्हते. त्याना दोन दिवस रेल्वेत काढावे लागले. नंतर ते सुखरुप घरी पोहोचल्याची बातमी मला मिळाली.

अशाप्रकारे माझा मुंबईच्या पाउसाचा अनुभव खुप वेगळा असाच होता. माझ्या वडिलांसाठी तो काही वेगळा होता. तसाच तो प्रत्येक मुंबईकरासाठी वेगवेगळाच असेल. काहींसाठी तो चांगला असेल तर काहींसाठी तो खुप वाईटही असेल. पण प्रत्येकासाठी तो आयुष्यभर लक्षात राहण्यासारखामात्र नक्कीच होता.

आज जवळपास एक वर्ष पुर्ण होते आहे. तेव्हा विचार केला की माझा अनुभव जरुर सांगावा...

2 comments:

Vishal K said...

एकदोनदा पावसाळ्यात मुंबईत गेलो असताना पडलेला पाऊस सोडला तर मुंबईचा पाऊस मला फारसा अनुभवायला मिळाला नाही. पण एकंदरीत मुंबईच्या पावसाचं सगळीकडे वर्णन वाचून तो अनुभवायची इच्छाही नाही.

छान लिहीलं आहेस.. असंच लिहीत राहा.

Vishal K said...

मराठी ब्लॉगविश्वात स्वागत असो.